शेतकर्‍यांनी हरकती, सूचना लेखी स्वरुपात नोंदवाव्यात   

पुरंदर प्रस्तावित विमानतळ 

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६२ च्या कलम ३२ (२)ची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचीनुसार वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या ७ गावांतील सातबारा उतार्‍यांवर भूसंपादनांचे शेरे यांची नोंद घालण्यात येत आहे. तसेच या संदर्भात शेतकर्‍यांच्या काही हरकती सूचना असतील तर त्या लेखी स्वरुपात नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. आलेल्या हरकतींवर शेतकर्‍यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.
 
भूसंपादनासाठी तीन उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या अधिकार्‍यांकडून भूसंपादनाची ३२ (२) ची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे भूसंपादन अधिकार्‍यांना प्रत्यक्ष जागेवर जाण्याची व पाहणी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आता संबंधित गावातील जमिनीच्या खरेदी विक्रीवर बंधने घालण्यात आली आहे. आता जमीन मालकांना भूसंपादनाच्या नोटीसा बजावण्यात येत आहे. याबाबत शेतकर्‍यांना याबाबत हरकती संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
विमानतळाबाबत आलेल्या हरकतींवर अधिकारी सुनावणी घेऊन शेतकर्‍यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि पारगाव या गावातील शेतकर्‍यांना २९ मे पर्यंत तर एखतपूर, मुंजवडी, खानवडी या गावातील शेतकर्‍यांना २५ मे पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.
 
या विमानतळासाठी या ७ गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र पारगावमधील संपादित होणार आहे. या गावातील १ हजार ५४२ सर्व्हे नंबर मधील ९७२ हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्याखालोखाल खानवडी गावातील ३८१ सर्व्हे नंबर मधील ४५१ हेक्टर जागा, कुंभारवळण मधील ४२४ सर्व्हे नंबरमधील ३४१ हेक्टर, वनपूरी गावातील ३६२ सर्व्हे नंबरमधील ३३० हेक्टर, उदाचीवाडी १९९ सर्व्हे नंबरमधील २४० हेक्टर, एखतपूर मधील १४५ सर्व्हे नंबरमधील २१४ हेक्टर आणि मुंजवडी मधील २२१ सर्व्हे नंबरमधील १२२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

Related Articles